माहुर :-दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढता असून तीव्र उन्हामुळे मानवासह पशुपक्ष्यांना ही उन्हाच्या झळा पोहोचू लागल्या असून सकाळी अकरा वाजल्यापासूनच रस्ते निर्मनुष्य होऊन सामसूम होत आहेत अशातच जंगलात वनवा लागण्याच्या घटना अधून मधून सुरू असतानाच आज दि.२ मे रोजी दुपारी साडेबारा ते एक च्या सुमारास माहूरच्या दिवानी व फौजदारी न्यायालय इमारती पासुन हाकेच्या अंतरावरील जंगल असलेल्या भागात अचानक आग लागल्याने एकच तारांबळ उडाली.माहूर नगरपंचायतची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी वेळेवर पोहोचल्याने आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळविण्यात यश आले.व पुढील अनर्थ टळला.
माहूर शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालय मालकीच्या परिसरात पश्चिमेला संरक्षक भिंतीलगत मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे असलेला जंगल परिसर आहे.आज भरदुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ऊत्तरेकडील जंगल परिसराकडून दक्षिण दिशेकडे न्यायालय इमारती पासून अगदी ७० ते ८० फुटाच्या अंतरावर झाडाझुडपांना अचानक आग लागली. न्यायालय परिसरातील सर्वांचे लक्ष तिकडे गेल्यावर न्यायाधीश कपाडिया यांनी ताबडतोब माहूर नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांना भ्रमणध्वनीवरून आग लागल्याची सूचना देऊन अग्निशमन दलाची गाडी पाठविण्यास सांगितले. कार्यालयीन अधीक्षक स्वामी हे रजेवर असल्याने त्यांनी ताबडतोब माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना आगीच्या घटनेची माहिती दिली. नगराध्यक्ष दोसानी यांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना गाडी घेऊन आग लागलेल्या न्यायालय परिसराकडे जाण्यास सांगितले.त्यानुसार अग्निशमन दलाचे कर्मचारी अविनाश रुणवाल, स्वच्छतादूत गणेश जाधव व शेंडे यांनी घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाडीसह धाव घेतली. सुदैवाने जवळपास 100 फुटाच्या आतील परिसरातच झाडाझुडूपांमध्ये आग पसरली होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग ताबडतोब नियंत्रणात आणली.आगीचे कारण मात्र स्पष्ट नसून, न्यायालय सारख्या अतिशय दक्ष ठिकाणच्या जागा परिसरात आग लागल्याची घटना घडल्यामुळे आग विझेपर्यंत काही वेळ न्यायधीशांसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. न्यायधिश महोदयांचे आग लागताच त्याकडे ताबडतोब लक्ष गेले म्हणून पुढचा संभावित अनर्थ टळला.नसता आगीसमोर सर्व सारखे असून निसर्ग निर्मित वणवा असो अथवा मानवाच्या चुकीमुळे लागलेली आग चुकीची माफी नाहीच.परिणाम एकच सर्व जळून खाक. त्यामुळे अशा घटना वारंवार घडू नये म्हणून प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी ओळखून खबरदारी घेतली तर अशा आगीच्या घटना टाळता येऊ शकतात.किंबहूना आगीवर लवकर नियंत्रण मिळवून होणारे संभावित गंभीर परिणाम निश्चितच टाळता येऊ शकतात. हेच या घटनेनंतर सिद्ध होते.
अग्नीशमन दलाने केलेल्या कामगिरी बद्दल मा. न्यायाधीशा कडून कौतुकीचे पत्र….
न्यायालयीन परिसरात वनवा पेटला होता. त्यामुळे मी नगरपंचायत येथील अधिक्षक श्री वैजनाथ स्वामी यांना फोन करुन अग्नीशमन दलाची गाडी पाठविण्याची विनंती केली. त्यांनी विनाविलंब केवळ १० मिनीटात गाडी न्यायालयात पाठवली. तसेच गाडी सोबत असलेले श्री गणेश जाधव व त्यांच्या टिमने अथक परिश्रम करुन वनवा विझवला व मोठी हाणी टाळली.
यापुर्वीही मागील वर्षी एप्रिल व मे महिन्यात दोनदा न्यायालयीन परिसरात वनवा लागला होता. त्यावेळेस देखील स्वामी व जाधव यांनी तात्काळ मदत पोहचवली. सबब आपले व आपल्या टिमचे अभिनंदन करण्यसाठी हे पत्र लिहीत आहे. भविष्यातही आपण अशीच कामगिरी कराल या बाबत आशा बाळगुन पुनश्च धन्यवाद.
प. घ. तापडीया
दिवाणी न्यायाधीश क. स्तर, माहुर
