माहूर:- माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील १९९२ पासून प्रलंबित असलेली पोलीस ठाण्याची मागणी पूर्णत्वास गेली असून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया मार्फत राज्याच्या गृह विभागाकडे सुसज्ज इमारत,४० कर्मचारी व ३ अधिकाऱ्यांच्या निवास स्थनासह जिम, टॉवर असा १० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून या आठवड्यात निविदा प्रक्रिया सुद्धा होणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस चे विधान सभा सरचिटणीस मनोज कीर्तने यांनी दिली आहे.ते मंत्रालयात आपल्या खाजगी कामा साठी गेले असता त्यांना वाई बाजार च्या नूतन पोलीस ठाण्याचा इमारती बाबत माहिती मिळाली.


जनतेच्या सेवातत्परतेसाठी पोलीस ठाणे मोक्याच्या ठिकाणी असणे गरजेचे असते.त्या मुळे कुख्यात नक्षली विजय कुमार च्या काळात सिंदखेड या निजामकालीन पोलीस ठाण्याला वाई बाजार येथे हलविण्याची मागणी १९९२ ला मंजूर झाली होती.मात्र तेव्हा पासून म्हणजे मागील तब्बल ३० वर्षात ही मागणी पूर्ण होऊ शकली नव्हती,आता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया चा प्रस्ताव गेल्याने व निविदा प्रक्रिया सुद्धा लवकरच या आठवड्यात होण्याची संभावना असल्याने वाई बाजार येथील पोलिस ठाण्याची मागणी काही दिवसातच पूर्ण होईल अशी शक्यता बळावली आहे.
_____ वाई बाजार येथील जमिनीचा वाद ——
वाई (बाजार) येथे पोलीस ठाणे होण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर जमीनमालकांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते जमीन परत मागण्याच्या हेतूने उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे कळाले. काही कृत्रीम अडचणींमुळे त्यांनी मागे दाखल केलेल्या याचिका अपुर्ण पाठपुराव्यापायी ती रद्द झाली होती. आता मुळ जमीन मालक कैलास बेहेरे हे पुन्हा याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
