सरकारच्या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजेंचे आमरण उपोषण मागे

मुंबई: सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी उत्तर दिलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढेच नव्हे तर संभाजीराजे यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत. काहीच ठेवायचं नाही असा निर्णयच सरकारने घेतला असून या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्यसरकारकडे सात मागण्या केल्या होत्या. मात्र या मागण्या मान्य झाल्या नव्हत्या. त्यामुळे संभाजी छत्रपती यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी उपोषणही सुरू केलं होतं. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. त्यांचा रक्तदाबही वाढला होता. सरकारकडून चर्चेला येण्याचं त्यांना निमंत्रण दिलं होतं. मात्र, राजेंनी चर्चेला जाण्यास नकार दिला होता. शिष्टमंडळाला त्यांनी सरकारकडे चर्चेला पाठवलं. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी आझाद मैदानात जाऊन सरकारने दिलेलं लेखी आश्वासन संभाजी राजेंना वाचून दाखवलं. त्यानंतर या तिन्ही मंत्र्यांनी राजेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मागण्या मान्य झाल्याने संभाजी राजे यांनी लहान मुलाच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषण सोडलं.